About this book
'कथा' हा मानवी उत्क्रांतीबरोबरच जन्माला आलेला एक वाङ्मयप्रकार भासावा, एवढा तो चिरपुरातन अन नित्यनुतन. आता तो केवळ एककेंद्री अन चिंचोळा न राहता संक्रांत होऊन समाज 'लक्ष्या'वर सुपरसॉनिक भेदक मारा करणारा अन समाजाच्या पोटात शिरून 'बायोप्सी' करणारा झाला आहे. ह्या अशा कथेची अन कथनाची भारतीय संस्कृतीत एक स्वतंत्र परंपरा नांदत आली आहे. पंकज कुरुलकर हे देखील याच भारतीय कथनपरंपरेतील आता एक महत्त्वाचे नाव झाले आहे. अधिकउण्या वीस संग्रहांच्या निर्मितीने त्यांनी कथालेखक म्हणून एक स्वायत्त नाममुद्रा मराठी सारस्वतात उमटवली आहे. त्यांचा प्रत्येक कथासंग्रह हा विषयाची वैविध्यता, शैलीची नावीन्यता, भाषेची सहजता आणि विचारांची परिप्लुतता लेवूनच अवतरतो. त्यामुळेच एक प्रयोगशील आणि वाचकप्रिय कथाकार म्हणून कुरुलकर सर्वश्रुत आहेत. 'रावण, दुर्योधन आणि मृत्यू' हा कथासंग्रह देखील त्याला अपवाद नाही. मानवी जीवनातील वृत्ती-अपप्रवृत्तींबरोबरच विकार- वासना आणि सहजप्रेरणा यांचा ह्या कथा धांडोळा घेतात. मृत्यू गरखा गंभीर विषय केंद्रभागी घेऊन त्याचे विविध आयाम तपासतात; तर कधी 'अकेशिनी', 'वृंदावन', टिटवी' यांसारख्या कथा स्त्रीजीवनाचे तलस्पर्शी भावविश्व उलगडून दाखवतात. दीर्घकथेच्या शक्यतांचे सूचन करू पाहणाऱ्या कुरुलकरांच्या ह्या संग्रहातील आठही कथा वाचकाला गुंतवून ठेवतात, त्याची उत्कंठा वाढवतात, नवा विषय पेरत जातात आणि कधी अंतिमतः कलाटणी देखील देतात. मानवी जगण्यातील शक्यतांचा कुरुलकर जसा शोध घेऊ पाहतात; तसेच 'कथा' ह्या वाङ्मयप्रकाराच्या शक्यतांचा देखील ते अदमास घेऊ पाहतात. त्या दृष्टीने कुरुलकरांचा हा कथासंग्रह लक्षणीय ठरावा असाच आहे. - केशव तुपे
Book images
About the author
Reviews & ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a reviewNothing written here yet.